Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:सर्वागीण, नेमका व नियोजित अभ्यास हाच एमपीएससीचा राजमार्ग!

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:सर्वागीण, नेमका व नियोजित अभ्यास हाच एमपीएससीचा राजमार्ग!

तुकाराम जाधव, शनिवार, ९ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com 
विद्यार्थी मित्रहो, १ मार्च २०१२ पासून म्हणजे गेल्या सुमारे ३ महिन्यांपासून आपण एमपीएससी परीक्षेविषयी विविधांगी चर्चा करत आहोत. प्रस्तुत लेख हा या मालिकेतील शेवटचा म्हणजे समारोपाचा लेख होय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती बदलल्याचे जाहीर करताच दै. लोकसत्ताने या बदलाविषयी सर्वागीण माहिती देण्यासाठी या लेखमालेचे आयोजन करण्याचा तत्काळ निर्णय घेतला. त्यामुळेच या लेखमालेद्वारा राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती आणि अभ्यासाचे धोरण याविषयी सविस्तरपणे जाणून घेणे संभव झाले. ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’तील विविध जाणकार प्राध्यापकांनी आपल्या अनुभवाच्या आधारे राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांविषयी पायाभूत मात्र सर्वागीण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज या लेखमालेचा समारोप करताना एकंदर राज्यसेवा परीक्षेच्या तयारीची रणनीती सारांशरूपाने अधोरेखित करणे महत्त्वपूर्ण ठरते.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे एमपीएससी ही एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने ‘आपण स्वत:ला कसे सिद्ध करतो आणि इतरांच्या तुलनेत कसे सरस ठरतो’, यावरच आपले यश अवलंबून आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप, म्हणजे त्यातील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांचे स्वरूप बारकाईने लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. अर्थात गेल्या तीन महिन्यात या बाबी अत्यंत बारकाईने लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यासाठी निर्धारित केलेला अभ्यासक्रम आणि त्यासाठी वाचावयाचे संदर्भसाहित्यही लक्षात घेतले. प्रस्तुत बाबी लक्षात घेतल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, ‘आता अभ्यास किती व कसा करायचा?’ या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांला लवकरात लवकर समजते-उमजते तो विद्यार्थीच या परीक्षेत इतरांच्या तुलनेत सरस ठरतो. मागे अधोरेखित केल्याप्रमाणे राज्यसेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करण्यापूर्वी योग्य नियोजनाची आखणी करणे ही प्राथमिक बाब ठरते. त्यासाठी प्रस्तुत टप्प्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची पुस्तके, त्या-त्या अभ्यास घटकातील आपली गती आणि त्या विषयाला परीक्षेत असणारे गुणांच्या भाषेतील महत्त्व या घटकांच्या आधारे वेळ व अभ्यासाचे नियोजन करावे. अर्थात हा अभ्यास सर्वागीण म्हणजे त्यातील संकल्पना, सिद्धांत, आकडेवारी, त्यातील कल आणि एकंदर विषयासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी या बाबींना लक्षात घेऊन करावा. अभ्यास करत असतांनाच त्या-त्या घटकावर आतापर्यंत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न याचा सतत विचार करावा. थोडक्यात, आपण जे काही वाचत आहोत त्यावर कशाप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचे नेमके उत्तर कोणते याचा सतत विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळेच आपल्या तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यासाठी अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्यावा आणि त्याद्वारे स्वत:चे मूल्यमापन करावे. आपल्या मूल्यमापनातून जे कच्चे दुवे लक्षात येतील त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा. या संदर्भात सतत लक्षात ठेवायची बाब म्हणजे अभ्यासातील सातत्य होय. कारण राज्यसेवेची प्रभावी तयारी करण्यासाठी किमान एक वर्ष नियमित १०-११ तासांची गरज आहे यात शंका नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला योग्य वेळ देऊन त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य बनते. यासाठी अभ्यासातील सातत्य व नियमितता या बाबींना पर्याय नाही. अन्यथा, एखाद्या घटकाला वेळ अपुरा पडण्याचीच शक्यता आहे. म्हणूनच कधी जास्त, कधी कमी असे न करता अत्यंत नियोजनबद्धपणे नियमित अभ्यास करण्यावर भर द्यावा.
आजपर्यंत लेखमालेतील विविध लेखांद्वारे आपण राज्यसेवेच्या प्रत्येक टप्प्यातील अभ्यासपद्धतीविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. त्यातही नवा अभ्यासक्रम आणि नव्या परीक्षापद्धतीला लक्षात घेऊन कशाप्रकारे अभ्यास करायचा? त्याचे नियोजन कसे असावे, या महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा केली आहे. आता गरज आहे ती प्रस्तुत लेखमालेतील प्रत्येक सूचना आणि मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याची. अर्थात आपण सर्वानीच अभ्यासाची सुरुवात केली असणार यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व जण उद्याची राज्यसेवा पूर्व परीक्षा देण्यास सज्ज असणार. तेव्हा तुम्हा सर्वाना उद्याची पूर्वपरीक्षा आणि त्यानंतरच्या नव्या राज्यसेवा मुख्यपरीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा!

No comments: